राज्यात सर्वत्र मान्सूनने दमदार हजेरी लावली असताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात मात्र अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.त्यामुळे येथील चास कमान धरण अद्याप कोरडे ठाक आहे. याच सोबत परिसरातील अनेक धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नसून, शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून परिसरात केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. खरीप हंगामातील पेरण्या, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता या भागाला जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे भीमाशंकर पट्ट्यातील नागरिक आणि शेतकरी आता दमदार मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.